दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य होतं, पण हार्दिक पंड्याचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 247 धावाच करू शकला. अशाप्रकारे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी विजय मिळवला.
या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे 10 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. तर मुंबई इंडियन्सचे 9 सामन्यांत केवळ 6 गुण आहेत. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने 32 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले.
याशिवाय टीम डेव्हिडने 17 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. इशान किशन 14 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने 8 चेंडूत 8 धावा करून माघारी परतला. 13 चेंडूत 26 धावा करून सूर्यकुमार यादव खलील अहमदचा बळी ठरला.