पुणे – भारतीय खेळाडूंनी गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अतिशय चांगली तयारी केली असून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळविले आहे हे लक्षात घेतले तर यंदाच्या ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री ऑलिंपिक नेमबाजपटू अंजली भागवत यांनी येथे व्यक्त केली.
पॅरिसमध्ये सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा (olympic sport) स्पर्धा निमित्ताने डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऑलिम्पिक महोत्सवाचे ऑलिंपिक नेमबाजपटू अंजली भागवत व ऑलिंपिक बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सरचिटणीस मिहीर केळकर आणि वित्त सचिव गिरीश इनामदार यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते. यानिमित्ताने ऑलिंपिक विषयक आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.
अंजली भागवत anjali bhagawat यांनी पुढे सांगितले की यंदाच्या ऑलिंपिक मध्ये आपले अनेक युवा खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्यामध्ये चमकदार कामगिरी करण्याची क्षमता आहे. सुदैवाने गेल्या दोन वर्षांमध्ये वेगवेगळ्या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी सातत्यपूर्ण सुरेख कामगिरी बजावली आहे. त्याचा फायदा त्यांना ऑलिंपिक मध्ये निश्चितपणे मिळणार आहे. केंद्र शासनाने तसेच वेगवेगळ्या राज्यातील शासनांनी खेळाडूंना उत्तम प्रकारच्या सुविधा, आर्थिक सहकार्य चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या दिल्या आहेत त्यामुळे अतिशय निश्चिंत मनाने या खेळाडूंनी सराव केला आहे. त्याचे प्रतिबिंब यंदाच्या ऑलिंपिक मध्ये निश्चितपणे दिसेल.
क्रीडा विषयक प्रदर्शनाबद्दल कौतुक व्यक्त करीत निखिल कानिटकर यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमधून खेळाडूंबरोबरच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळणार आहे खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचाही मोठा वाटा असतो. यंदाच्या ऑलिंपिक साठी भारतीय खेळाडूंची खूप चांगली तयारी झाली आहे, त्यामुळे गतवेळच्या ऑलिंपिकच्या तुलनेमध्ये यंदा भारतीय खेळाडू अधिक चांगली पदके जिंकून आणतील अशी मला आशा आहे. प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी आणि सामन्याच्या वेळी मानसिक दृष्ट्या भक्कम आणि कणखर असणे आवश्यक आहे. त्याचीही आपल्या खेळाडूंनी मानसिक तंदुरुस्ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली आहे. त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे पदक जिंकण्यासाठी होणार आहे.
मिहीर केळकर आणि गिरीश इनामदार यांनी ऑलिंपिक महोत्सव आयोजनाबद्दल माहिती दिली तसेच भारताच्या ऑलिम्पिक चळवळीमध्ये डेक्कन जिमखाना क्लबने किती मोठा वाटा उचलला होता हे देखील सांगितले.