मुंबई, :- राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून उत्साहात होणार आहे. विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार, १६ जूनपासून, तर विदर्भात सोमवार, २३ जून २०२५ पासून शाळा सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार असून, शालेय शिक्षण विभागाने या उपक्रमाचे व्यापक नियोजन केले आहे.
राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करून मुलांची उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, तसेच वरिष्ठ अधिकारी आपल्या नजिकच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भेट देणार आहेत. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शाळेतील भौतिक व पूरक सुविधा, पोषण आहार, खेळाच्या सुविधा आणि स्वच्छतेच्या सवयी यांचा आढावा घेतला जाणार आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करून विद्यार्थ्यांचा शासकीय शाळांकडे कल वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत. ‘निपूण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमात पालकांचा सहभाग वाढावा यासाठी वरिष्ठ अधिकारी पालकांशी संवाद साधणार आहेत.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त, व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना शाळांना भेटी देण्याचे आवाहन केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांनी अधिकारी, शिक्षक, पालक, समाज यांना एकत्र येऊन दर्जेदार शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, दर्जेदार शिक्षण, आणि सर्वांगीण विकासाची संधी मिळणार असून, समाजाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.