पिंपरी – खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ६ वा वर्धापनदिन उत्सव गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून धुळे ग्रामीणचे युवा आमदार राघवेंद्र भदाणे उपस्थित होते. कार्यक्रमात मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राहुल कलाटे, पाटील उद्योग समूहाचे चेअरमन दिपक काशिनाथ पाटील, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेवक देविदास पाटील, रवींद्र सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अनिल पवार आणि चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कर्नल रामकृष्ण रंगराव वाघ यांना ‘समाजभूषण पुरस्कार’, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद सदाशिव वाघ यांना ‘उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार’, उपव्यवस्थापकीय संचालक सारथी अनिल पवार यांना ‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’, संदीप पाटील यांना ‘युवा उद्योजक पुरस्कार’, हर्षल बोरसे यांना ‘खान्देश गौरव पुरस्कार’, गणेश निकम यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’, गुणवंत सोनवणे यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार’, वेदांत पाटील यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’, प्रशांत पाटील यांना ‘युवा उद्योजक पुरस्कार’, हेमराज अहिरे यांना ‘खान्देश रत्न पुरस्कार’, सोनाली काळे यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’, जितेंद पाटील यांना ‘खान्देश उद्योजक पुरस्कार’, अशोक थोरात यांना ‘उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार’ आणि भावेश माळी यांना ‘बालकलाकार दांडिया किंग’ म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीरंग बारणे, शंकर जगताप, संजोग वाघेरे आणि नामदेव ढाके यांनी आपल्या भाषणात खान्देश समाजाच्या योगदानाचे कौतुक केले आणि संघाच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातून खान्देश समाजाच्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक करतांना समाजाच्या उत्कर्षासाठी संघाच्या पुढील उपक्रमांची माहिती दिली. कार्याध्यक्ष शरद पाटील, सचिव शंकर पाटील आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या शेवटी खान्देशातील अहिराणी कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. आभार प्रदर्शन शंकर पाटील यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल वाघ यांनी उत्कृष्टरीत्या केले.