24.1 C
New Delhi
Tuesday, December 9, 2025
Homeमहाराष्ट्रयुद्ध - आतंक हे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही

युद्ध – आतंक हे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही

प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांचे विचार

पुणे, – : “आज संपूर्ण जगात अशांतता माजली आहे. बॉम्बहल्ले, दंगे, आतंकवाद वाढत चालला असून साम्राज्यवादी देशात युद्धाची स्पर्धा अधिकच वाढली आहे. युद्ध – आतंक हे कोणत्याही समस्येवर उपाय नाही. अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.” असे विचार शक्तिमान आणि महाभारत कार्यक्रमातील भीष्म पितामह फेम व प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च(आयसर) चे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, यशदा या आयएस अकादमीचे संचालक, रंगनाथ नाईकडे, डॉ. बी. एस. नागोबा, दूरदर्शनचे माजी कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश शर्मा, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ. दिपेंद्र शर्मा, डॉ. भरत चौधरी आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे होते.
मुकेश खन्ना म्हणाले,” आजची मुले ही उद्याच्या भविष्य आहे. मोबाईल च्या आभासी जगात हीच मुले खूप गुंतलेली दिसतात. त्यामुळे ती अधिक अस्वस्थ आहेत. मोबाईलच्या अतिवापर पासून त्यांना दूर ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी नैतिकतेची शिकवण देणारी संस्कृतची शिक्षण व्यवस्था आणायला हवी.”
रंगनाथ नाईकडे म्हणाले, ” संतांचे विचारच आज विश्वबंधुत्वाचे बीज पेरू शकतात. आज लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये संत साहित्य रुजवण्याची गरज असून योगा, मेडिटेशन, अध्यात्मामुळे आजची मुले सक्षम होतील. उत्तुंग ध्येयाची भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हाच उपाय आहे.”
डॉ. अरविंद नातू म्हणाले, ” विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान मानवी आरोग्यासाठी कृत्रिम औषध उपचार देते. अध्यात्म हे मेडिटेशन, योगा, ध्यान धारणेच्या माध्यमातून प्राकृतिक आरोग्य उपचार देते. अलीकडे लोकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्म हाच एकमेव उपाय आहे.”
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ” विश्वशांतीसाठी काम करणाऱ्या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. ज्ञानोबा तुकोबांचा संपूर्ण जगाला जोडणारा विचार हाच आजच्या विनाशकारी जगात एक आशेचा किरण आहे. केवळ विश्व मानवताच जगात शांती आणू शकते. आपण सर्वजण या मार्गाचे पाईक होऊया.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन गाडेकर यांनी केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
29 %
4.6kmh
0 %
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!