मुंबई- केकेआरने १० वर्षांनंतर पुन्हा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने सहज लक्ष्य गाठले.

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४ चा चॅम्पियन संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव करत मोठा विजय नोंदवला. हैदराबादने केकेआरला विजयासाठी अवघ्या ११४ धावांचे सोपे आव्हान दिले होते. कोलकाता संघाने अवघ्या षटकांत हे आव्हान सहज गाठले. व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाजच्या ९१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर झटपट धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ५२ धावा केल्या तर आंद्रे रसेलने ३ विकेट्स घेत चेंडूने चांगली कामगिरी केली. तर केकेआरच्या गोलंदाजांनी अंतिम सामन्यात चेंडूने हाहाकार केला.

अंतिम सामन्यात केकेआर संघाच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर संघाच्या फलंदाजांकडून अशाच खेळाची अपेक्षा होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही ज्यात त्यांनी ११ धावांवर सुनील नारायणच्या रूपात पहिली विकेट गमावली, जो केवळ ६ धावा करत पॅट कमिन्सचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने रहमानउल्ला गुरबाजसह आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या पहिल्या ६ षटकांत १ गडी गमावून ७२ धावांवर नेली. या सामन्यात दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे एकतर्फी केला. गुरबाजच्या बॅटमधून ३९ धावांची खेळी पाहायला मिळाली. तर व्यंकटेश अय्यर या सामन्यात संघाला विजेतेपद मिळवून देऊन परतला ज्यात त्याने ५२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. हैदराबादसाठी या सामन्यात पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी गोलंदाजीत १-१ विकेट घेतली.