अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. शनिवार, ३१ मे रोजी चौंडी येथे आयोजित त्रिशताब्दी जयंती उत्सवात त्यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्याचप्रमाणे अहिल्यादेवींच्या चरित्राचा प्रभावी चित्रपट तयार करून त्यांच्या कर्तृत्वाची ओळख संपूर्ण भारतात पसरविण्यात येईल. अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्यकारभार सांभाळून अनेक संकटांना सामोरे गेले आणि हिंदुस्थानातील मंदिरे व घाटांचे पुनर्निर्माण केले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अहिल्यादेवींनी आपल्या प्रजेला मुलासारखे वागवले आणि त्यांनी समाजात महिलांसाठी आदर्श निर्माण केला. चौंडीच्या विकासासाठी मोठा आराखडा तयार केला जात असून, महिलांना सक्षम करण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ही सुरु करण्यात येणार आहे.
अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या कार्याचा गौरव ठरेल आणि त्यांचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.