पुणे, – – भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे, विविध परंपरा, उपासना, खानपान, अनेक भाषा असे असूनही भारत एकसंध आहे. भाषेला धर्म नसतो आणि सीमा देखील नसतात, असे परखड मत ज्येष्ठ भाषा आणि व्याकरण तज्ञ प्रा. यास्मिन शेख यांनी लिखित संदेशातून आज येथे मांडले. आठव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी त्यांच्या वतीने त्यांची कन्या रुमा बावीकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आठव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामध्ये प्रा. यास्मिन शेख यांना शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यावेळी त्यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यात त्या पुढे म्हणतात की, मी मराठी भाषेची सेविका आहे. सर्व भाषांच्या व्याकरणाची माहिती घेतली तरच उत्तम अनुवाद करता येतो. अनुवाद हे एकमेव असे माध्यम आहे जे कोणताही वाद निर्माण करत नाही.
यावेळी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांना कवयित्री उर्मिलाताई कराड जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळीवज्येष्ठ पुरातत्व संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ अनुवादक डॉ. शुचिता फडके, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ अनुवादक डॉ. रवींद्र गुर्जर, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विवेक भोसले, मराठीकाका अनिल गोरे, ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने, संयोजिका तेजाली शहासने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ठाकूर म्हणाले की, सर्व धर्म, जाती, संप्रदाय यांना विविध भाषांनी जोडून ठेवले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वच धर्मियांचे योगदान आहे. त्यादृष्टीने विविध भाषांचा उपयोग आपल्या देश बलवान होण्यासाठी करायला हवा. देशातील सर्व नागरिकांनी भारतीयत्वाची भावना जपायला हवी.
“अनुवादातून राष्ट्रभक्ती” या संकल्पनेला वाहिलेल्या या दोन दिवसीय साहित्य संमेलनात जीवनगौरव पुरस्कारांबरोबरच स्वातंत्र्यसेनानी व त्यांचे वारस, सेनादलातील सैनिक आदींचे सत्कार करण्यात आले.
ओळख देशभक्तांची हा उपक्रम सुमारे तीन वर्षे चालला, ज्यात महाराष्ट्रातील विविध शाळांमधून राष्ट्रभक्त क्रांतिकारकांची सचित्र माहितीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या उपक्रमाच्या समाप्तीची घोषणा यावेळी करण्यात आली. उपस्थितीतांचे स्वागत मंजिरी शहासने, ॲड. नंदिनी शहासने, भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. वैशाली कार्लेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर तेजाली शहासने यांनी आभार मानले.


