पुणे ः शिक्षणामुळे बौद्धिक आणि सामाजिक विकास होतो, हे बाब सरकारमधील मंडळींना उमजत नाही का, मागिल तीन दशकांपासून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पाया घालणाऱ्या शिक्षणाला सरकारचे प्राधान्य नाही. वेगवेगळ्या आयोगांनी शिक्षणासाठी जादा खर्च करण्याची शिफारस केली असली, तरी सरकार मात्र शिक्षणावरचा खर्च कमी करीत आहे. उलट, शिक्षणातून सरकार अंग काढून घेत आहे, ही मोठी शोकांतिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.
सुरवसे पाटील म्हणाले की, देशातील खेड्या-पाड्यातील वाड्यावस्त्यांवर एक लाखांहून अधिक शाळा एक शिक्षकी असून त्यातून विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडत असेल, याचा विचारच न केलेला बरा. राज्यकर्त्यांना पडत ना शिक्षण व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना. काटकसर कुठे करावी, याचे भान राहिले नाही. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात फक्त एकाच शिक्षकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या १४ हजार शाळा होत्या. या शाळांमध्ये सुमारे ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या देशाचे शिक्षण बजेट आधीच खूप कमी आहे आणि त्या पैशाचा योग्य वापर केला जात नाही. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या घसरत्या दर्जामागे आपल्या धोरणकर्त्यांचा निष्काळजीपणा हा एक प्रमुख घटक आहे यात शंका नाही. आपण आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देत आहोत? आपण त्यांच्यासाठी चांगल्या भविष्याची आशा कशी करू शकतो? हे स्पष्ट आहे, की एकच शिक्षक सामाजिक विज्ञान, भाषा, विज्ञान, इंग्रजी आणि गणित या विषयांमध्ये तज्ज्ञ असू शकत नाही. एकाच शाळेतील अनेक वर्गातील शिक्षक फक्त विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवेल की त्यांना शिकवेल, असा प्रश्न कुणालाच पडत नाही. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. त्यांना शैक्षणिक विषयांसोबतच सह-अभ्यासक्रम उपक्रमांचे ज्ञान दिले पाहिजे; पण जेव्हा शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसतात, तेव्हा तिथले शिक्षण कसे असेल याची कल्पना करणे कठीण नाही. अभ्यास हा शाळेचा एकमेव महत्त्वाचा पैलू नाही. मुलांच्या पूर्ण शारीरिक विकासासाठी खेळ, शारीरिक शिक्षण आणि योग यासारखे वर्ग महत्त्वाचे आहेत; पण जेव्हा पुरेसे शिक्षक नसतात, तेव्हा सह-अभ्यासक्रम उपक्रमांचा पाठपुरावा करणे अकल्पनीय असते. निःसंशयपणे, आपण विद्यार्थ्यांच्या अंधकारमय भविष्याचा पाया रचत आहोत. आम्हाला देश घडवायचा आहे, आजच्या बालकाच्या हाती देश द्यायचा आहे, त्यांना साधे शिक्षणही देऊ शकत नाही, हे राज्यकर्त्यांना अशोभनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यापन प्रक्रियेवर चर्चा का होत नाही
विद्यार्थ्यांचे मूल्यांकन त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवरून केले जाते. त्यामुळे अध्यापन प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर कोणतीही चर्चा होत नाही. विद्यार्थी कसे शिकतात आणि त्यांना काय माहिती आहे, शिक्षक कसे शिकवतात, शाळेचे वातावरण आणि विद्यार्थी कोणती मूल्ये बिंबवत आहेत यासारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जाते. शिक्षकांना वर्गात शिकवण्याचे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता आहे का आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि शिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाते का, याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही.
सरकार शिक्षणातून अंग काढून घेत आहे- रोहन सुरवसे पाटील
विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
RELATED ARTICLES
New Delhi
haze
26.1
°
C
26.1
°
26.1
°
69 %
0kmh
20 %
Tue
30
°
Wed
33
°
Thu
33
°
Fri
34
°
Sat
33
°