वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत अधिकारी आणि नागरिक यांच्यासोबत बैठक
आगामी काळ हा सण-समारंभाचा काळ आहे. त्यामुळे या काळात नागरिक खरंदीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती करा, असे निर्देश ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोथरुड मधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, पुणे महानगरपालिका शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, क्षेत्रीय उपायुक्त यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तथा कोथरुड मधील विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूककोंडीच्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने आंबेडकर चौक परिसर, एरंडवणे गुळवणी पथ, एमआयटी कॅालेज परिसर, पौड रोड, कर्वेरोड, कोथरुड डेपो आदी भागातील वाहतूक कोंडीच्या समस्या मांडल्या. त्यावर ना. पाटील यांनी सर्व समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
आंबेडकर चौक भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच, भविष्याचा विचार करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच, एमआयटी कॅालेजजवळ बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्यासोबतच भरधाव वाहनांसाठी गतिरोधक उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच, वाहतूक कोंडीला कारण ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. त्यासोबतच , आगामी काळ हा सण-समारंभाचा काळ आहे. त्यामुळे या काळात नागरिक खरंदीसाठी बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे संभाव्य वाहतूककोंडी टाळण्यासाठी कोथरुड मध्ये ५० वॅार्डनची नियुक्ती कराव्यात असे निर्देशही या बैठकीत दिले.
यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ना. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपाययोजनांचे कौतुक करून आभार मानले. तसेच, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या तथा नो पार्किंग मध्ये गाडी लावून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी वाहतूक विभागाने PTP traffic हे ॲप कार्यन्वित केले असून; या ॲपवर आजपर्यंत ४५०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३२०० जणांवर कारवाई झाली असल्याची माहिती देत, नागरिकांनी याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. त्यासोबतच एफसी रोड येथे AI कॅमेरा कार्यान्वित करुन वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, उर्वरित पुणे शहरातही कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, आजच्या बैठकीत प्राप्त तक्रारी तथा वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा दर दहा दिवसांनी आढावा घेणार असल्याचे ही त्यांनी यावेळी बैठकीत नमूद केले.
बाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेश
बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, पोलिस आयुक्त कार्यालय, एनएचएआय, पीएमआरडीए आदी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांकडून आलेल्या समस्यांची गांभीर्याने नोंद घेतली आणि संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सण-उत्सवाचा काळ सुरू होण्याआधी सर्व प्रमुख प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मा. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीत नागरिकांनी ज्या मुद्द्यांवर भर दिला त्यात जुपिटर चौक, गणपती मंदिर चौक, दसरा चौक, ममता चौक, सीएम इंटरनॅशनल, साई चौक, राधा चौक येथील वाहतूक नियोजन, सिग्नल, वॉर्डन्सची संख्या वाढवणे, अतिक्रमण हटवणे, अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी ड्रेनेज दुरुस्ती, सबस्टेशनची उभारणी आणि दारू दुकानदारामुळे होणारा त्रास हे विषय होते.

नागरिकांनी विशेषतः नानावरे ब्रिजजवळील साचलेले पाणी, पदपथ अतिक्रमण, बसस्टॉपची आवश्यकता, रस्ते व फूटपाथ दुरुस्ती, झाडांची छाटणी, मेट्रो पुलाखालच्या ठिकाणी साचलेले पाणी, आणि रस्ते अधिग्रहणाच्या समस्यांबाबत सविस्तर मांडणी केली. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला सदानंद रेसिडेन्सी हॉटेलजवळील सर्व्हिस रोड अंडरपास संदर्भातील मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावर त्वरित उपयोजना करून काम सुरू करण्याच्या सूचना NHAI अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, हे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.या बैठकीत बालेवाडीतील सर्व फेडरेशनचे प्रतिनिधी, तसेच पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस, महाळुंगे येथील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, प्रकाश तात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे, ज्योतीताई कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, शिवम सुतार, शिवम बालवडकर, अस्मिता करंदीकर तसेच कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


