पुणे : आगामी २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच संघटन बळकट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाच्या वाढत्या विस्ताराला अधिक धार देण्यासाठी नव्या रणनीती आखल्या जात असून, त्याचा स्पष्ट संकेत पुण्यातील कार्यकर्ता मेळाव्यातून मिळाला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात आयोजित ‘सक्रिय कार्यकर्ता संमेलनात’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या राजकीय वातावरणाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्ष च्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
चव्हाण यांनी पक्षाच्या सध्याच्या संघटनात्मक ताकदीवर प्रकाश टाकताना सांगितले की, भाजपकडे सध्या सुमारे दीड कोटी सदस्य आणि अडीच लाखांहून अधिक सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, ही ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल युगात सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता, कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांवर अधिक सक्रिय राहावे, असे त्यांनी आवाहन केले. “आजच्या राजकारणात ‘नॅरेटिव्ह’ महत्त्वाचा ठरतो. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवली गेल्यास त्याला त्वरित आणि ठाम उत्तर देणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.


