CENTRAL BUDGGET | पुणे – : केंद्रीय अर्थसंकल्प केवळ व्यक्तिकेंद्री न राहता राष्ट्राच्या उभारणीला प्राधान्य देणारा असावा. या निकषावर यंदाचा अर्थसंकल्प स्वागतार्ह ठरतो, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी व्यक्त केले. एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग, तसेच पदव्युत्तर वाणिज्य महाविद्यालय आयोजित अर्थसंकल्पावरील व्याख्यानात ते बोलत होते. गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अर्थसंकल्पात किती तरतूद केली गेली, याबरोबरच तिचा विनियोग कसा केला गेला, ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी परफॉर्मन्स बजेटसोबतच जेंडर बजेटिंगचे पैलू देखील अभ्यासावेत, असे आवाहन करत टिळक यांनी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचे तपशीलवार विश्लेषण केले. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशी क्षमता विकसित करण्यावर सरकारचा भर दिसत असून, ‘हार्ड-पॉवर’ ऐवजी ‘सॉफ्ट-पॉवर’ यंदाच्या बजेटच्या केंद्रस्थानी असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या चर्चेत राज्याचा तसेच महापालिकांचा अर्थसंकल्प दुर्लक्षित राहत असल्याची खंत टिळक यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पाचे केवळ अंतिम प्रारूप न पाहता त्याचा प्राथमिक अंदाज, तसेच आर्थिक सर्वेक्षण अहवाल विद्यार्थ्यांनी साकल्याने अभ्यासावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी समाजातील सर्व घटकांसानी अर्थसंकल्प समजावून घेण्याची गरज उद्धृत केली. तत्पूर्वी, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक मनोगतातून व्याख्यानाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. उपप्राचार्य डॉ. मृणालिनी घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. व्यासपीठावर मान्यवरांसह पदव्युत्तर वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अशोक कोकाटे तसेच डॉ. प्रमिला पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमास एसएनडीटी पुणे आवारातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


