मुंबई : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी गावातील उच्च प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीचे छत मुसळधार पावसामुळे कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा इमारतींच्या तपासणीसाठी राज्य सरकारकडून तातडीने पावले उचलली जात आहेत.
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्यातील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (दूरदृश्य प्रणालीद्वारे), समग्र शिक्षण प्रकल्प संचालक संजय यादव, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रांतील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींची तपासणी करून त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अहवाल संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करून इमारतींचे नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा. धोकादायक शाळा इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शाळांमध्ये सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि आवश्यक सुधारणा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, असेही निर्देश डॉ. भोयर यांनी दिले.