मुंबई-मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मानखुर्द-शिवाजीनगर परिसरातून भारतीय जनता पक्षाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १३५ मधून भाजपचे उमेदवार नवनाथ बन यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दणदणीत विजय नोंदवला आहे. भाजपचे माध्यम प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नवनाथ बन यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारत या प्रभागात भाजपची ताकद ठसठशीतपणे अधोरेखित केली आहे.या विजयाचे विशेष महत्त्व म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रभाग विरोधी पक्षांच्या ताब्यात होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने तरुण, आक्रमक आणि संघटनात्मक ताकद असलेल्या उमेदवारांना संधी दिली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नवनाथ बन यांनी ‘मानखुर्दचे परिवर्तन’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला होता.
निकाल जाहीर होताच मानखुर्द परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनाथ बन यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “दणदणीत विजय…!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेतील भाजपची विजयाची मालिका अधिक मजबूत झाली आहे.राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा प्रभाग क्रमांक १३५ हा पारंपरिकपणे ‘उबाठा’ गटाचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, भाजपने नवनाथ बन यांच्या रूपाने एक सुशिक्षित, स्पष्टवक्ते आणि आक्रमक चेहरा मैदानात उतरवत हा किल्ला सर केला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, मुंबईच्या राजकारणातील बदलते समीकरण दर्शवणारा ठरत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवनाथ बन यांनी परिसरात सातत्याने जनसंपर्क साधत विकासकामांवर भर दिला होता. स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा आणि नागरिकांशी थेट संवाद यामुळे त्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. त्याचीच पावती आज मतपेटीतून मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
या विजयामुळे मानखुर्द-शिवाजीनगर प्रभागातील रखडलेल्या प्रश्नांना गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेतील भाजपची स्थिती अधिक भक्कम होण्याच्या दृष्टीने हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


