पुणे ): डिजिटल प्लॅटफॉर्मचा अतिवापर घातक असून त्याचे शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. मात्र योग्य खबरदारी बाळगल्यास सायबर धोक्यांपासून बचाव करणे शक्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सायबर तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे ज्ञानस्रोत केंद्र आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. एसएनडीटी पुणे आवार-समन्वयक डॉ. शितल मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिक सातत्याने सायबर फसवणुकींचे शिकार होत आहेत. महिलांना देखील शिताफीने अशा जाळ्यात अडकविण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे टाळण्यासाठी आवश्यक ज्ञान घेणे, इंटरनेटचा वापर मर्यादित करणे आणि समाजमाध्यमांचा वापर करताना भान ठेवणे गरजेचे आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. आपल्या व्याख्यानातून सायबर गुन्ह्यांचे विविध किस्से सांगत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कोणते उपाय योजावेत, याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. ग्रंथोत्सवादरम्यान आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रंथपाल डॉ. सुभाष चव्हाण यांनी ग्रंथालयातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. उपग्रंथपाल डॉ. विलास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. मनीषा जठार यांनी सूत्रसंचालन केले. विविध विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ध्यासपर्व फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींच्या प्रश्नांना डॉ. देशपांडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तरे दिली.


