“
पुणे, – समाजातील दोष शोधुन कार्य केले तर ठरलेल्या उद्दीष्टाकडे वाटचाल करणे सोपे जाते, तरुण पिढीच देशाच्या विकासाचे बलस्थान आहे, सर्वांना मिळून देश पुढे न्यायचा आहे, त्यामुळे फक्त बोलण्यापेक्षा कार्य कृतीत आणावेत, असे विचार लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी आज येथे मांडले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, कौशलम् न्यास, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कॉसमॉस फाउंडेशन व नागरी लिपी परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून “आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?” या विषयावरील निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य सम्प्रसाद विनोद होते.

यावेळी हसबनीस पुढे म्हणाले की, विकासाबरोबरच देश हा आदर्श व समर्थही असावा लागतो आणि तसे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिले होते. तेच स्वप्न देशातील सर्व नागरिकांच्या आणि युवा पिढीच्याही मनात आहे, मात्र त्यासाठी योजनापूर्वक कार्य करण्याची गरज आहे आणि त्यादिशेने सकारात्मक विचार करायला हवा.
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक अशी तीन विभागात राष्ट्रीय युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, संस्कृत व तेलगू भाषेत निबंध सादर करण्यासाठी सुमारे 900 स्पर्धकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 300 निबंध निवडले गेलेे. या स्पर्धेत प्रत्येक विभागात प्रथम तीन व उत्तेजनार्थ अशा एकूण 35 स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त प्रदीप रावत, स्पर्धेच्या संयोजिका लीना मेहेंदळे, स्पर्धेचे परिक्षक शरद जोशी, धनेश्वरजी आणि भारतीय विद्या भवनचे संचालक नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते. सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल www.kyps.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.संयोजिका मेहेंदळे म्हणाल्या की, या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी वर्गाला काही टिप्स मिळाव्यात व त्यांचा उत्साह वाढावा या दृष्टीने अनुभवी व्यक्तींचे विचार स्पर्धेच्या @nibandhkaushalam या यूट्यूब चॅनेलवर संकलित केलेले आहेत. यासाठी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, लेफ्टनंट जनरल बक्शी व माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची विशेष व्याख्याने उपयोगी ठरली. सदरच्या यूट्यूब चॅनेलचा उपयोग भविष्यात नव्या विषयांवर स्पर्धा घेण्यासाठी देखील होईल. स्पर्धकांनी व्यक्त केलेले विचार संकलित करून ते केंद्र सरकारच्या निदर्शनास आणावेत व पुस्तकरूपाने जपून ठेवावेत असाही मानस आहे. स्पर्धकांच्या वतीने राम तक्षक, नेदरलँड (हिंदी स्पर्धेचे विजेते) यांनी आपले विचार व्यक्त केले. सुनीता फडके यांनी सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.


