पुणे : जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याने राजकीय समन्वयाचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. चार वर्षांनंतर या पदांवर नव्या चेहऱ्यांची नियुक्ती झाली असून, ‘समन्वयातून जिल्हा परिषद ब्रँड’ निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी जितेंद्र बडेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अंकिता पाटील, तसेच इतर दोन समित्यांच्या सभापती म्हणून दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांची निवड करण्यात आली.
या निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार उमेदवारांनी अर्ज सादर केले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा साधली.
या चर्चेनंतर विरोधी पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चारही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार उरला. सर्वसाधारण सभेत अर्ज वैध ठरल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी चौघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यानंतर अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे तसेच श्रीकांत खरात आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला.
या बिनविरोध निवडीमुळे जिल्हा परिषदेत सहकार्य आणि समन्वयाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


