33 C
New Delhi
Monday, July 6, 2026
HomeTop Five Newsअनावश्यक शस्त्रक्रियांवर लगाम

अनावश्यक शस्त्रक्रियांवर लगाम

खासगी रुग्णालयांच्या तपासणीसाठी राज्य समिती सक्रिय

पुणे : राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या संदर्भात राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, तिच्यामार्फत मागील तीन वर्षांतील शस्त्रक्रियांची सखोल तपासणी केली जाणार आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाची माहिती दिली. समितीच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य समस्यांचा अभ्यास करताना विशेषतः गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक होत्या की अनावश्यक, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.

या बैठकीस आमदार डॉ. मनीषा कायंदे, नमिता मुंदडा यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध जिल्ह्यांतील शासकीय आरोग्य संस्थांचे प्रमुख आणि तज्ज्ञ सदस्यांनीही सहभाग घेतला.

समितीच्या माध्यमातून अनावश्यक शस्त्रक्रियांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. यासाठी समितीचा वार्षिक कार्यक्रम आखण्यात येणार असून, तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यसेवेवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत सुमारे एक लाख महिलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली आहे. तसेच, स्थलांतरित कामगारांसोबत असणाऱ्या सुमारे पाच हजार मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाच्या गरजांवरही चर्चा करण्यात आली. मासिक पाळी स्वच्छतेसाठी आवश्यक साधनांचा पुरवठा, सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता यांसारख्या विषयांवरही महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत.

बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला ‘मिशन साथी’ उपक्रम हा यासाठी आदर्श ठरत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य साथी नियुक्त करून ऊसतोड कामगारांची माहिती संकलित केली जाते आणि त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी समन्वय साधला जातो. जिल्ह्यात सध्या ७७० आरोग्य साथी कार्यरत असून, त्यापैकी ४४६ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अशा प्रकारचे उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांतही राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकूणच, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा असून, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आणि सकारात्मक टप्पा मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
33 ° C
33 °
33 °
54 %
2.7kmh
78 %
Mon
42 °
Tue
37 °
Wed
36 °
Thu
38 °
Fri
39 °

Most Popular

Recent Comments