तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप
पुणे ,: दक्षिणेकडील राज्यातील नेतेमंडळी, अभिनेते, साहित्यिक हे त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात. कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेते कावेरी नदीच्या पाणी प्रश्नात एकत्र आल्याचे आपण पाहिले. अशाच पद्धतीने राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास, कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thakre यांनी व्यक्त केले.
विश्व मराठी समेलनाची सांगता राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ठाकरे यांनी आपले विचार मांडले. या समारंभात ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख Ritesh Deshmukh यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे Sayaji Shinde, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार Ullas Pawar, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे Rajesh Pandey आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, आपण आपल्या भाषेवरती ठाम राहायला हवे, तेव्हाच जग तुम्हाला दाद असते. आज फ्रेंच लोकांना आपल्या भाषेचा भरपूर अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याशी फ्रेंचमध्येच संवाद साधावा लागतो. आपण आपल्या भाषेतून इतिहासातून बोध घेणार नसेल, तर त्याचा काही फायदा नाही. आपल्याला इतिहास आणि भूगोल माहिती असायलाच हवा.
काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतर, बाहेरील लोकांना तेथे जमिनी घेता येतात. मात्र, आजही हिमाचल, आसाममध्ये इतर राज्यातील जमीन विकत घेऊ शकत नाही. अशावेळी महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्या, उद्योजकांना का मोकळीक दिली आहे. हजारो एकर जमिनी बाहेरच्या लोकांकडून खरेदी केल्या जात आहेत. जमिनी जाणार असतील, लोक बेघर होणार असतील, काही कामाचे नाही. ते अस्तित्व मिटवण्याचा प्रकार असतो. अशावेळी मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकले नाही, तर मराठी भाषा कुठून टिकेल. त्यामुळे राज्य सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
देशमुख म्हणाले की, मराठी घरात जन्म घेणे ही भाग्याची बाब आहे. जन्म घेतल्यावर पहिला शब्दही मराठीत कानावर पडतो. या मराठीमुळे आपली ओळख होते. मी हिंदी सिनेमात काम करीत असलो, तरी माझे स्वप्न मराठीत आहेत. मराठी माझ्या हृदयात आहे. त्यामुळे मराठीचे प्रेम कमी होणार नाही. हिंदी चित्रपटात काम करीत असलो तरी मराठी चित्रपट तयार करणे सोडणार नाही माझ्या प्रोडक्शन हाऊस ने गेल्या दहा वर्षात केवळ मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून, यापुढेही सुरू राहील. विश्व मराठी संमेलनात रत्न पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शिंदे यांनी त्यांच्यासोबत परदेशात घडलेला किस्सा सांगत, मराठी भाषेविषयी आपल्या सर्वांना प्रेम, आदर आणि अभिमान असायला हवे, असे स्पष्ट केले.
…
…
साहित्यिकांना विनंती आहे की, त्यांनी बोललं पाहिजे. त्यांनी आपली रोखठोक मते मांडायला हवीत. साहित्यिकांना केवळ पुस्तक लिहून चालणार नाही, तर मार्ग दाखवायला हवा. त्यांनी आपली भूमिका मांडायला हवीत. साहित्यिक बोलायला लागतील, तेव्हा लोक ऐकतील. त्यातून त्यांची पुस्तकेही अधिक वाचली जातील, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
…
….
नाशिकला पुढील विश्व मराठी संमेलन
…
मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने संमेलन यशस्वी झाले. मराठीसाठी राज्यात लढणाऱ्या नेत्याच्या उपस्थितीमुळे समारंभाला शोभा आली. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला अभिमान मला आहे. असाच अभिमान मराठी भाषेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटायला हवा. तेव्हाच चांगले काम मराठी भाषेच्या विभागाकडून होणार आहे. मी मराठी भाषा विभागाचा मंत्री झाल्यानंतर, विश्व मराठी संमेलन राज्यातील विविध ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील संमलेन नाशिक शहरात होणार आहे, असे सामंत यांनी जाहीर केले.
…
…
युवा पिढीने पुस्तक साहित्य वाचायला हवे. इतरांना पुस्तकांविषयी सांगायला हवे. भाषा जपली पाहिजे, ती टिकणार नसेल, तर संमेलनाला काही अर्थ नाही. आपण आपले महापुरुष मोठे करायला हवे. प्रत्येक महापुरुष आपल्या सर्वांचे असायला हवे. महाराष्ट्र हा जातीपातीच्या राजकारणात न अडकता मराठी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे