NAVALE BRIDGE | पुणे : मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर अपघातांचे सत्र कायमच सुरू असून सोमवारी दुपारी पुन्हा एक बहुगाडी अपघात घडला. चार ते पाच वाहनांची परस्परांना धडक झाल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली आहे.
यापूर्वीच १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नवले पुलावर भीषण अपघात झाला होता. नियंत्रण सुटलेल्या ट्रेलरने वाहनांना जोरदार धडक दिल्याने एका प्रवासी कारला आग लागली आणि आठ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा एकदा अपघाताची पुनरावृत्ती झाली.
नियंत्रण सुटल्यानेच हा नवा अपघातही झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती हाताळून वाहतूक पूर्ववत केली आहे.
नवले पुलावर गेल्या पाच वर्षांत किती अपघात झाले?
गेल्या पाच वर्षांत या परिसरात २५७ अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी ९५ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. मागील पाच वर्षात नवले पूल परिसरात ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात ९४ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे नवले पूल परिसर मृत्यूचा सापळाच झाल्याची भीती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.


