पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने अधिकृत मान्यता दिली असून, या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत घोषणा केली.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचे स्वागत करत हा प्रकल्प पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
मोहोळ यांनी सांगितले की, वाढती एअर कनेक्टिव्हिटी ही उद्योग, आयटी, व्यवसाय, पर्यटन आणि कृषी निर्यात क्षेत्रासाठी निर्णायक ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर पुरंदर विमानतळ हा पुणे व पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा पर्याय ठरणार असून, प्रवासी तसेच मालवाहतूक क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे.
आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशिया या महत्त्वाच्या जागतिक मार्गांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होण्यास मदत होईल. त्यामुळे निर्यात, परकीय गुंतवणूक आणि जागतिक व्यवसाय संधींना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग, एमएसएमई उद्योग तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे. तसेच रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि गुंतवणूक वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, असेही मोहोळ यांनी नमूद केले.
राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून पुरंदर विमानतळ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


