S.T.BUS NEWS- एसटी म्हटलं की डिझेल, धूर आणि खचाखच भरलेली जुनी बस! पण आता हे चित्र बदलणार आहे. महाराष्ट्रात सुरु होतोय एसटीचा नवा इलेक्ट्रिक अध्याय – आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही. परिवहन मंत्र्यांच्या घोषणेमुळे राज्यातील लाखो प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. जुन्या चुकांवर पडदा टाकून आता एसटी पुन्हा ट्रॅकवर येतेय…”
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेच्या आधुनिकीकरणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील १० वर्षांत सर्व जुन्या एसटी बसेस टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी आधुनिक इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तयार केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुण्यात केली.
सरनाईक म्हणाले की, एसटी विभागात लवकरच ५ हजार नवीन बसेस घेतल्या जाणार आहेत, त्यापैकी १ हजार इलेक्ट्रिक बस असतील. २०२९ पर्यंत २५ हजार बसांचा नवा ताफा तातडीने एसटीच्या सेवेत दाखल होईल.
स्मार्ट बसेस आणि सुरक्षेचा भर
नव्या स्मार्ट बसेसमध्ये सर्व अत्याधुनिक सेवा-सुविधा, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक तंत्रयंत्रणा बसवण्यात येणार आहेत.
स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्तींचा अनधिकृत प्रवेश रोखणारी यंत्रणा, तसेच आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद देणाऱ्या सुविधा नव्या बसेसमध्ये उपलब्ध असतील, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व डेपोचा कायापालट
राज्यातील सर्व एसटी डेपो आणि बसस्थानकांचे आधुनिकीकरण दोन महिन्यांत सुरू होणार आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवाशांची सोय या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून हे काम हाती घेतले जाईल.
एसटी महामंडळाच्या मालकीतील बससंच
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, नव्या बसेस लिझवर न घेता काही भागांमध्ये त्या खासगी कंपनीकडून तयार करून घेतल्या जातील, पण त्यांची मालकी एसटी महामंडळाकडेच असेल.
संचित तोट्यावर श्वेतपत्रिका
सध्या एसटी महामंडळावर ११ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. या पार्श्वभूमीवर शासन श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार असून, जुने निर्णय पुन्हा तपासून पुढील अडीच वर्षांत हळूहळू सुधारणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ई-वाहन धोरणावर भर
पुण्यात भारतातील सर्वात मोठ्या कमर्शियल वाहन व रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीवरील ‘कमर्शियल व्हेईकल फोरम 2025’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ई-वाहन पॉलिसीवर प्रकाश टाकला. या पॉलिसीचा मुख्य उद्देश ई-वाहनांच्या उत्पादनाला चालना देणे, तसेच वापरकर्त्यांना प्रोत्साहन देणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. वाहन निर्मिती उद्योगांमध्ये महाराष्ट्राचे देशातील अग्रगण्य स्थान त्यांनी अधोरेखित केले.या परिषदेत देशातील आघाडीचे व्यावसायिक वाहन उत्पादक, ऑटो सप्लायर्स, डीलर्स आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले होते. यावेळी इंडस्ट्रीतील ट्रेंड्स, नवकल्पना आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा झाली.परिषदेत ‘ऑफ हायवे सेगमेंट’ पासून ते शाश्वत वाहतूक आणि ई-वाहन यांच्या उपायांबद्दल विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. तसेच, ‘द कमर्शियल व्हेईकल अँड फ्लीट ऍवार्ड’ अंतर्गत या क्षेत्रातील प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.प्रताप सरनाईक यांनी कमर्शियल वाहन क्षेत्राच्या बळकटीसाठी अशा मंचांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. राज्य सरकारकडून या क्षेत्राला अधिक सक्षम व सुलभ बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
