SUGAR CANE NEWS | पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामात देशासह राज्यातील साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. सुरुवातीला SUGAR देशात ३५० लाख टन आणि राज्यात ११० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता हा अंदाज घसरून देशात सुमारे ३१५ लाख टन, तर महाराष्ट्रात १०० लाख टनांवर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
३१ मार्चअखेर देशात २७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, राज्यात ९८.८७ लाख टन उत्पादनाची नोंद झाली आहे. राज्यातील गाळप हंगाम पुढील ८ ते १० दिवसांत संपण्याची चिन्हे असून, बहुतांश कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

यंदा राज्यात एकूण २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १८७ कारखाने आधीच बंद झाले असून, उर्वरित २३ कारखाने लवकरच गाळप थांबवणार आहेत. आतापर्यंत सुमारे १,०४३ लाख टन ऊस गाळपासाठी आला असून, त्यातून ९८ लाख ८७ हजार टन साखर उत्पादित झाली आहे. यंदा सरासरी साखर उतारा ९.४८ टक्के इतका मिळाला आहे.
विभागनिहाय पाहता, कोल्हापूर विभागात (SUGAR CANE) सर्वाधिक २३.१९ लाख टन साखर उत्पादन झाले असून, त्यानंतर पुणे विभागात २२.१८ लाख टन आणि सोलापूर विभागात सुमारे १९ लाख टन साखर तयार झाली आहे.
देशातील परिस्थितीही काहीशी अशीच असून, गाळपासाठी उपलब्ध ऊस कमी होत चालल्याने आणि पुढील गाळपातून साखर उतारा घटत असल्याने उत्पादनात घट होत आहे. परिणामी, देशातील एकूण साखर उत्पादनाचा अंदाज २८३ ते २८५ लाख टनांपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, देशातून यंदा सुमारे ७ ते ८ लाख टन साखर निर्यात केली जाणार असून, सुमारे ३१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवली जाणार आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोरील आव्हाने कायम असली तरी इथेनॉल निर्मितीमुळे उद्योगाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


