पुणे: “अभिनयातून प्रेरणा देण्याचे काम होते. चित्रपटाची कथा प्रेरणात्मक असेल तरच मी ती स्वीकारते. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी चांगले चित्रपट पाहून प्रेरणा घ्यावी. आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्याचा उपयोग करावा. प्रत्येकाने स्वयंप्रेरणेतून नात्यातील अथवा करियरमधील निर्णय घ्यावा,” असे मत प्रख्यात अभिनेत्री अदा शर्मा यांनी व्यक्त केले.
‘तुमको मेरी कसम’ या चित्रपटाच्या निमित्ताने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमावेळी अदा शर्मा बोलत होत्या. ‘मला मराठी येते आणि मी मराठीतून संवाद साधायचा प्रयत्न करते’ या त्यांच्या वाक्यावर सभागृहाने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली. ‘स्त्रीशक्ती’ उपक्रमाबद्दल त्यांनी ‘सूर्यदत्त’चे अभिनंदन केले.
कार्यक्रमावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्रेरक वक्ते डॉ. दत्ता कोहिनकर, प्रशांत पितालिया, एस. रामचंद्रन, किरण राव, मनीषा कुंभार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेशु अगरवाल (शिक्षण), ऍड. रूपल चोरडिया (पत्रकारिता), शोभा कुलकर्णी (सूत्रसंचालन व अध्यात्मिक सेवा) यांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डॉ. दत्ता कोहिनकर यांची ‘मनशक्ती व तणावमुक्ती’ विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत १००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अभिनेता ईश्वाक सिंग म्हणाले, “कष्ट, आवड आणि प्रयत्न या त्रिसूत्रीच्या आधारे आपापल्या क्षेत्रात यश शक्य आहे. ग्लॅमरस क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्वानी आपली आवड जाणून घेणे गरजेचे आहे. स्वतःशीच स्वतःची ओळख गरजेची आहे. एक उत्कृष्ट चित्रपट आपल्या भेटीसाठी येत आहे. आपण जरूर तो पाहावा.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “संपूर्ण महिनाभर सुरु असणाऱ्या ‘स्त्रीशक्ती’ महिना कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तुमको मेरी कसम’ चित्रपटाचे कथानक संवदेनशील असून महिलांसाठी महत्वाचे आहे. चित्रपट, चित्रपट कलाकार आणि त्यांचे जीवन यातून विद्यार्थ्यांना सातत्याने नवे काही शिकता यावे, याकरिता असा हा उपक्रम आहे. प्रत्येकाने योग्य परिपक्वता आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्या आवडीचे अनुसरण करत करिअरबद्दल निर्णय घ्यावा आणि कठोर परिश्रम करावे.”
डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, “बाह्यमन अंतर्मनाला ज्याप्रकारे सूचना देतात, त्याप्रकारे संप्रेरकांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये करण्याचे काम अंतर्मन करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा व स्वतःवर प्रेम करावे. जसा तुम्ही विचार कराल, तसे तुम्ही घडत असता. ९० टक्के आजार मानवी मनाशी संबंधित असतात. त्यामुळे मनावर नियंत्रण हवे. सकारात्मक राहण्यावर भर द्यावा.प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.