मुंबई – राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना तसेच नागरिकांच्या घरांना पाणी शिरल्याने मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि प्रभावितांना त्वरित मदत देण्याचे आश्वासन दिले.
गुरुवार, २९ मे रोजी बारामतीत पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “धान्य देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले त्यांना १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे होणार आहेत. मी सतत या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. बारामतीत असलो तरी दोन दोन तासांनी माझे फोन सुरु आहेत. त्यामुळे काळजी करू नका. जे नुकसान झाले त्यात शक्य ती सगळी मदत आम्ही करणार आहोत.”
यावेळी त्यांनी रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरे, वीज खांब आणि वाहून गेलेले रस्ते यांचा देखील आढावा घेतला. शेतकरी आणि गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून, पुढील काही दिवसांसाठी विविध भागांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना गंभीर समस्या भेडसावत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन करत, शासनाकडून तातडीने मदत आणि पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यांनी प्रभावितांना आश्वासन दिले की, नुकसान भरपाईसाठी सर्व आवश्यक ती मदत लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाईल.