election news – मुंबई- राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. नगरविकास मंत्रालयाने महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी केले असून, मुंबईमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभाग असतील. तर, इतर महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग ठेवण्यात येणार आहेत. लवकरच निवडणुका होण्याची शक्यता असून, राज्य सरकारने या प्रक्रियेला गती दिली आहे.
नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेचे स्वतंत्र आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. मुंबईसह अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी संबंधित आयुक्तांवर, तर ड वर्गातील महापालिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
इतर मागास वर्गाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून, या प्रक्रियेत गुगल मॅपचा आधार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईपर्यंत ती गुप्त ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया अडीच ते तीन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई महापालिकेसाठी ८ सप्टेंबर २०२२च्या अधिनियमानुसार २२७ प्रभाग तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग रचना करताना महापालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार आणि संगणकतज्ञ यांची समिती महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्तांनी तयार केलेले प्रारूप राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करावे लागणार आहे. त्यानंतर आयोगाकडून मान्यता मिळाल्यावर प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती आणि सूचना मागवून, सुनावणी घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली जाईल.
नगरविकास विभागाने नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचनेचे आदेशही दिले असून, २५ जानेवारी २०२२च्या अधिनियमानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
प्रभाग रचनेचे वर्गीकरण
- अ वर्ग: पुणे, नागपूर
- ब वर्ग: ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
- क वर्ग: नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर
- ड वर्ग: मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, पनवेलसह १९ महापालिका
राज्यात सध्या एकूण २९ महापालिका (जालना आणि इचलकरंजी नव्याने समाविष्ट), २४८ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायती आहेत. यापैकी बहुतांश संस्थांमध्ये प्रशासक कार्यरत आहेत.
प्रशासक असलेल्या संस्था
- महापालिका: २९
- नगरपरिषदा: २४८
- नगरपंचायती: ४२ (मुदत संपलेल्या व नवनिर्मित)
- एकूण नगरपरिषदा व नगरपंचायती: २९०
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असून, लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.