मुंबई, – महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रमुख चेहेरे असलेले छगन भुजबळ अखेर आज महायुतीच्या मंत्रिमंडळात दाखल झाले आहेत. आज सकाळी १० वाजता राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणं हे महायुतीतील संतुलनासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. त्यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांतून त्यांनी आपली खंत स्पष्टपणे मांडली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती, आणि संयम ठेवण्याचा सल्ला मिळाल्यानंतर त्यांनी प्रतीक्षा स्वीकारली होती.
मागील सरकारमध्येही अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळ यांच्याकडेच होतं. नंतर ते खाते धनंजय मुंडे यांच्याकडे गेलं होतं. आता पुन्हा त्याच खात्याची सूत्रं भुजबळ यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होणार आहे.
छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशामुळे महायुतीतील अंतरंग राजकारणात नवीन समीकरणं उभी राहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.