मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आता रेल्वे प्रवासातून अनुभवता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव यात्रा’ उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा भव्य शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही गौरव यात्रा सर्व प्रवाशांसाठी प्रेरणादायी ठरणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वातंत्र्य लढा आणि इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे.”
या विशेष सर्किट रेल्वेत ७०० हून अधिक प्रवासी सहभागी झाले असून, त्यातील ८० टक्के प्रवासी चाळीस वर्षांखालील आहेत. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या प्रवाशांना रायगड, शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची आणि शिवकालीन इतिहासाचा थेट अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५१व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या गौरव यात्रेला प्रारंभ झाल्याचा आनंदही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मोगल आणि परकीय आक्रमकांना पराभूत करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि अटकेपार झेंडा फडकावला. या गौरव यात्रेचा पहिला मुक्काम रायगड येथे असणार आहे.” या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे अधिकारी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आणि महाराष्ट्र पर्यटनाची माहितीपत्रके वाटण्यात आली. पाच दिवसांच्या या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या स्थळांना भेट, इतिहासावर आधारित कार्यक्रम, आणि सांस्कृतिक अनुभव प्रवाशांना मिळणार आहेत.
या गौरव सर्किटमुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम ठरणार आहे.