पुणे : पहगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ऑपरेशन सिंदूरसारखी मोठी कारवाई यशस्वी झाली, असे मत निवृत्त लष्कर अधिकारी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, ले. जनरल एस. एस. हसबनीस आणि एअर मार्शल एस. एस. सोमण यांनी व्यक्त केले.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी या मान्यवर लष्कर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.
माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी सांगितले की, “शत्रूला शांततेची भाषा समजत नसेल, तर युद्धाशिवाय पर्याय राहत नाही. आज भारतीय सैन्यदलाचे सामर्थ्य प्रचंड वाढले असून, संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता साधली आहे. या सर्व यशामागे भारत सरकारचा खंबीर पाठिंबा आहे.”
पाटणकर यांनी नागरिकांना सायबर हल्ल्यांबाबतही सतर्क राहण्याचे आवाहन केले. “युद्ध केवळ सीमेवरच नव्हे, तर अंतर्गतही लढावे लागते. सायबर हल्ला हे आजचे मोठे संकट आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सज्ज राहावे,” असे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीततेबाबत बोलताना लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस म्हणाले, “दहशतवादी हल्ल्यांना आता भारत जशास तसे उत्तर देत आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी विविध विभाग आणि काही मित्र राष्ट्रांनी मिळून महत्त्वपूर्ण माहिती संकलित केली.”
एअर मार्शल एस. एस. सोमण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये इंटिग्रिटी (प्रामाणिकता) आणि इच्छाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येकाने आपले काम जबाबदारीने पार पाडले आणि सरकारचा ठाम पाठिंबा असल्यानेच ही मोहीम यशस्वी झाली,” असे त्यांनी सांगितले.