Daund–Pune DEMU Train | दौंडहून पुण्याकडे येणाऱ्या डेमू ट्रेनच्या एका डब्यात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताच गाडीत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आणि काही काळासाठी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेदरम्यान डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या काही सतर्क प्रवाशांच्या लक्षात आगीचा प्रकार आला. त्यांनी तत्काळ जागरूकता दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही आग इतर डब्यांमध्ये पसरली नाही, अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता. प्रवाशांनी तातडीने या संदर्भातील माहिती संबंधित स्टेशन मास्तरला दिली, त्यानंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित डब्यातील प्रवासी सुरक्षितरित्या बाहेर काढले. घटनास्थळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. (Daund–Pune DEMU Train)
या घटनेमुळे काही काळासाठी रेल्वेसेवा विस्कळीत झाली असली तरी, सध्या गाड्या पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत सखोल तपास सुरू केला असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये शॉर्ट सर्किट किंवा डब्याच्या यांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७:०५ वाजता दौंडहून सुटलेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. आग लागली त्याचवेळी दुर्दैवाने एक प्रवासी आतमध्ये होता. दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धुराचे लोट येऊ लागले आणि आत अडकलेल्या व्यक्तीचा जीवघेणा आरडा-ओरड ऐकू येऊ लागला.गाडीत उपस्थित काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. काहींनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि सामूहिक प्रयत्नांतून दरवाजा फोडण्यात यश आले.
अडकलेला प्रवासी वेळेवर बाहेर काढण्यात आल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे.
घटनेची प्रवाशांनी तातडीने स्टेशन मास्तरला या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने यंत्रणांची तपासणी करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.
गेल्या आठवड्यातचमुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी (दि. ९ जून) सकाळी सुमारे ९.३० वाजता मुंब्रा स्थानकाजवळ भीषण रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून जात असताना, फुटबोर्डवर लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर घासल्या गेल्या आणि काही प्रवासी संतुलन ढासळून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळले.
या दुर्दैवी घटनेत चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ चौकशीसाठी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.