Sugar Cane News | पुणे : देशातील साखर उत्पादनात चालू हंगामात महाराष्ट्राने आघाडी घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्र अव्वल ठरणार असल्याचा अंदाज (इस्मा) यांनी व्यक्त केला. इस्माच्या मते, चालू हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन ३२४ लाख टन राहणार असून, त्यात महाराष्ट्राचा वाटा ११८ लाख टन, तर उत्तर प्रदेशचा वाटा ९८.५ लाख टन असेल.इस्माच्या कार्यकारी समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीनंतर चालू साखर हंगामासाठीचा तिसरा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचे मूल्यमापन करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंत झालेली ऊसतोड, शिल्लक क्षेत्र, उसाचे उत्पादन तसेच साखरेचा उतारा या सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे.इस्माच्या अंदाजानुसार, चालू हंगामात देशात ३२४ लाख टन साखर उत्पादन होईल. त्यापैकी ३१ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात येणार आहे. त्यामुळे निव्वळ साखर उत्पादन २९३ लाख टन राहील. हे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी अधिक आहे. याआधीच्या अंदाजात उत्तर प्रदेश साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर राहील, असे चित्र होते; मात्र नव्या आकडेवारीत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे.राज्यानिहाय विचार करता, महाराष्ट्रात साखर उत्पादन ११८ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात हे उत्पादन ९३.५१ लाख टन होते. उत्तर प्रदेशात चालू हंगामात ९८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून, गेल्या हंगामात ते १०१.१६ लाख टन होते. कर्नाटकात साखर उत्पादन ६१.०४ लाख टन राहण्याचा अंदाज असून, मागील हंगामात ते ५४.८८ लाख टन होते.

अतिरिक्त साठा ५३ लाख टन
इस्माने दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामाच्या सुरुवातीला (ऑक्टोबर २०२५) देशात साखरेचा अतिरिक्त साठा ५० लाख टन होता. उत्पादन, इथेनॉलसाठी वळविण्यात येणारी साखर आणि शिल्लक धरून, हंगामअखेर देशातील एकूण साखर साठा ३४३ लाख टन होणार आहे. देशांतर्गत साखरेची मागणी २८३ लाख टन असून, सुमारे ७ लाख टन साखर निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस साखरेचा अतिरिक्त साठा ५३ लाख टन राहील, असे इस्माने स्पष्ट केले.
तुऱ्यांमुळे ऊस उत्पादनात घट
इस्माच्या अहवालानुसार, चालू हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकात उसाचे उत्पादन काही प्रमाणात घटले असले, तरी साखरेचा उतारा वाढला आहे. उसाला मोठ्या प्रमाणात फुटलेले तुरे, तसेच जास्त पावसामुळे परिपक्वतेचा कालावधी कमी होणे, यामुळे उत्पादकतेवर परिणाम झाला. याशिवाय कारखान्यांकडून गाळपाचे प्रमाण वाढल्याने ऊसतोडणी लवकर झाल्याचाही परिणाम उसाच्या उत्पादनावर झाला आहे.
उसाच्या क्षेत्रात वाढ
इस्माने पुढे नमूद केले की, देशात उसाचे क्षेत्र वाढत असून विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊस लागवड वाढली आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन चांगले राहण्याची शक्यता आहे. पुढील हंगामातही ५३ लाख टन अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने देशांतर्गत साखरेची टंचाई भासणार नाही, असा विश्वास इस्माने व्यक्त केला आहे.


