पुणे : पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे ‘माहिती-चित्र रथ’ पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या दोन डिजिटल रथांचे उद्घाटन करण्यात आले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हे रथ संपूर्ण वारी मार्गावर केंद्र सरकारच्या अकरा वर्षातील विविध योजनांची दृक-श्राव्य माहिती आणि सांस्कृतिक सादरीकरण सादर करणार आहेत.
या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि पश्चिम क्षेत्र महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. या ऐतिहासिक वारीत केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती गावागावापर्यंत पोहोचवण्याचे काम हे माहिती-चित्र रथ करणार आहेत.”
या डिजिटल रथांवर एलईडी डिस्प्ले, कलाकारांची सांस्कृतिक सादरीकरणे, तसेच माहिती पुस्तिकांचे वितरण अशी सुविधा आहे. रथांमधून केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन, गरीब कल्याण, आत्मनिर्भर भारत, ‘ऑपरेशन सिंदूर’सह विविध योजनांची माहिती दृक-श्राव्य स्वरूपात दिली जाणार आहे. वारकऱ्यांसाठी हे रथ आकर्षण ठरणार असून, पारंपरिक गीत, कथा, आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.
राज्यमंत्री मोहोळ यांनी पुढे सांगितले, “गेल्या अकरा वर्षांत देशाची २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आली आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विकसित भारताचा पाया घालण्याचे काम या योजनांमधून झाले आहे.”
कार्यक्रमात केंद्रीय संचार ब्युरोच्या कलाकारांनी वारकरी संप्रदायावर आधारित गीतांचे सादरीकरण केले. गायक-गीतकार मकरंद मसराम यांच्या स्वरचित गीताचे विशेष कौतुक करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील जनतेला झालेल्या फायद्याचा उल्लेख केला.
वरील माहिती-चित्र रथ वारीच्या दोन्ही मार्गांवर लाखो वारकऱ्यांसोबत प्रवास करणार असून, सरकारी योजनांचे जनजागरण आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडणार आहेत.