33.1 C
New Delhi
Saturday, April 18, 2026
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुण्यात सत्ता स्थापन होणार नाही – विश्वजीत कदम

काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुण्यात सत्ता स्थापन होणार नाही – विश्वजीत कदम


पुणे, प्रतिनिधी –
पुणे महानगरपालिकेत सत्ता स्थापन करायची असेल तर काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय कोणालाही पर्याय राहणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस व समविचारी पक्षांना चांगले यश मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची आघाडी असून, या आघाडीच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, काँग्रेस नेते विरेंद्र किराड, अमीर शेख, यशराज पारखी, सुनील शिंदे,प्राची दुधाने आदी उपस्थित होते.
विश्वजीत कदम म्हणाले की, यंदाच्या मनपा निवडणुकीमुळे नागरिकांना आपला आवाज मांडण्याची संधी मिळत आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकीय नाटक पाहायला मिळत आहे. खालच्या पातळीवरील टीका करूनही सत्तेत एकत्र राहून जनतेची फसवणूक केली जात आहे. पुणे शहरातील अनेक मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, मनपा निवडणूक उशिरा झाल्याने प्रशासक राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसत होते, मात्र काँग्रेस आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देत प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला असून जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे, असे त्यांनी नमूद केले.
महायुतीतील पक्षांकडून तिजोरी आपली असल्याचे दावे केले जात आहेत, मात्र तिजोरीतील पैसा जनतेचा असून जनता खरी मालक आहे, असे कदम म्हणाले. राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यात महिलांची सुरक्षितता ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही पक्षाच्या आदेशाने त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. सध्या ते सांगलीत आमदार म्हणून कार्यरत असून भविष्यातही सांगलीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
33 %
3.6kmh
76 %
Sat
40 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
41 °
Wed
42 °

Most Popular

Recent Comments