येवला (नाशिक): शिक्षणव्यवस्था आणि प्रशासकीय क्षेत्रातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस व प्रशासकीय सेवांमध्ये संवेदनशील अधिकारी घडवण्यासाठी आयोजित केलेले एक दिवसीय ‘प्रशासकीय दृष्टीकोन मार्गदर्शन शिबिर’ १५ मार्च रोजी येवला येथे उत्साहात पार पडले.
कॉम्रेड रणजीत परदेशी आणि कॉम्रेड सरोजिनी कांबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, चेतना अकादमी व मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद को-ऑर्डिनेशन (लोकशाहीवादी) कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन ‘क्रांतीज्योती निवास’, पाबळे वस्ती येथे करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक आणि विचार
शिबिराच्या मुख्य सत्रात मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘पोलीस व प्रशासनाचा मानवी चेहरा’ या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. जेव्हा एखादा संवेदनशील आणि जागरूक तरुण प्रशासकीय व्यवस्थेत येतो, तेव्हा समाज त्याच्याकडे परिवर्तनाची मोठी आस लावून पाहतो. म्हणूनच केवळ पदासाठी नव्हे, तर लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी युवकांनी प्रशासनात येणे गरजेचे आहे, असा आशय मांडणीचा राहीला.

रायगड येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि विद्यार्थी समुपदेशक स्नेहा कर्णिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सध्याच्या स्पर्धा परीक्षेतील आव्हाने, आरक्षणाचे प्रश्न आणि सामाजिक सर्वहारांच्या मुलांपुढील संघर्षावर प्रकाश टाकला. ही स्पर्धा केवळ करिअरची नसून ती स्वाभिमानाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शिबिरात नाशिक,पुणे, धुळे जिल्ह्यासह विविध भागांतील विविध कार्यकर्ते, शेतकरी कुटुंबातील तरूण आणि संघर्षरत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सध्याच्या काळात सरकारी नोकरभरतीचे प्रश्न हेतुतः चिघळवले जात असताना, ग्रामीण भागातील तरुण मागे पडू नयेत आणि त्यांनी आत्मविश्वासाने या स्पर्धेत उतरावे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे चेतना अकादमी व आयोजक कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.शिबिराची सांगता विद्यार्थी आणि मार्गदर्शकांच्या प्रश्नोत्तर सत्राने झाली. या कार्यक्रमास डाॅ. रमेश पाटील, डाॅ. सायली जगताप, प्रा. मोहन जंगले, अॅड. विजय निकम, प्रा. मढवई, प्रा. निर्मळ, संतोष अहीरे, विकास गवई तसेच अभ्यासक, संवेदनशील प्रशासक आणि परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.


