लातूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला प्रतिसाद देत सलगरा येथे भव्य अस्थी विसर्जन घाट उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात येत असून, सामाजिक बांधिलकीचा आदर्श या माध्यमातून समोर आला आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. या वेळी गावातील ग्रामस्थ, मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी केवळ अस्थी विसर्जन घाटच नव्हे, तर मनोहर गार्डन, पूजा विधीसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिव मंदिर, तसेच धोबी घाट आणि गणपती विसर्जन घाट अशा विविध सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व धार्मिक आणि सामाजिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
लातूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना अस्थी विसर्जनासाठी पंढरपूर किंवा नाशिक येथे जावे लागत होते. तसेच, धोबी घाट नसल्यामुळे अपघातांच्या घटनाही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत ठराव करून ही मागणी सेवाकुंड ट्रस्टकडे मांडली होती.

या मागणीची दखल घेत सेवाकुंड ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजित भैय्या गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ भव्य आणि उपयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या कामाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अनुभवी अभियंते दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे केवळ धार्मिक गरजा पूर्ण होणार नाहीत, तर परिसराच्या विकासालाही चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


