पुणे,- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, कौशलम् न्यास, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कॉसमॉस फाउंडेशन व नागरी लिपी परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून “आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?” या विषयावर शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक अशी तीन विभागात राष्ट्रीय युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धा गेल्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, संस्कृत व तेलगू भाषेत निबंध सादर करण्यासाठी सुमारे 900 स्पर्धकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 300 निबंध निवडले गेलेे. या स्पर्धेत प्रत्येक विभागात प्रथम तीन व उत्तेजनार्थ अशा एकूण 35 स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेच्या संयोजिका लीना मेहेंदळे व भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज येथे दिली.
सदरचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या बुधवारी (28 जानेवारी) दुपारी 4 वाजता भारतीय विद्या भवनचे नातू सभागृह, सुलोचना नातू विद्या मंदिर, डॉ. के. एम. मुंशी मार्ग, शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. एस. हसबनीस उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य सम्प्रसाद विनोद लाभले आहेत. सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण www.kyps.in या वेबसाईटवरुन पाहता येईल तसेच अधिक माहितीसाठी 8888234444 किंवा 8805455093 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहिती देतांना मेहेंदळे म्हणाल्या की, आज भारत देश विकासाच्या दिशेने घोडदौड करीत आहे, यासाठी विकासाबरोबरच देश आदर्श आणि समर्थ असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने योजनापूर्वक कार्य होण्यासाठी व त्या दिशेने विचार करण्यासाठी प्रामुख्याने ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. देशासमोरचे हे ध्येय साध्य करण्यासाठी काही निकष असावेत व त्याचा वेळोवेळी आढावा देखील घेतला जावा या हेतूने निकष आणि मोजमापाशी संबंधित असा स्पर्धेचा विषय निश्चित केला होता. या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी वर्गाला काही टिप्स मिळाव्यात व त्यांचा उत्साह वाढावा या दृष्टीने अनुभवी व्यक्तींचे विचार स्पर्धेच्या @nibandhkaushalam या यूट्यूब चॅनेलवर संकलित केले होते. यासाठी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, लेफ्टनंट जनरल बक्शी व माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची विशेष व्याख्याने उपयोगी ठरली. सदरच्या यूट्यूब चॅनेलचा उपयोग भविष्यात नव्या विषयांवर स्पर्धा घेण्यासाठी देखील होईल. स्पर्धकांनी व्यक्त केलेले विचार संकलित करून ते केंद्र सरकारच्या निदर्शनास आणावेत व पुस्तकरूपाने जपून ठेवावेत असाही मानस आहे.


