मुंबई : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल कोसळल्याने अनेक पर्यटक अचानक नदीत कोसळले. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून, 38 जणांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. घटनेनंतर एनडीआरएफच्या पथकाने तत्काळ बचावकार्य सुरू केले असून, अजूनही शोधमोहीम सुरूच आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबाबत तात्काळ प्रतिक्रिया देत मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभाग व्यक्त केला. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बचावकार्य अधिक वेगाने राबविण्याचे तसेच एनडीआरएफ, अग्निशमन दल व रुग्णवाहिका तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले. याचबरोबर राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले आहेत.
शिंदे यांनी स्पष्ट केले की, अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पर्यटनस्थळी विशेषतः सुटीच्या दिवशी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशासन सतर्क ठेवणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्कात असून, जखमी व मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकूण 32 जण जखमी झाले असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
ही दुर्घटना प्रशासनाच्या दक्षतेवर आणि जुन्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.