school bus news -मुंबई- राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने यंदा मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये शाळा बस चालक, महिला कर्मचारी आणि सफाई कामगारांची दर आठवड्याला मद्यपान व अंमली पदार्थांची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
विदर्भातील शाळा २३ जूनपासून सकाळच्या सत्रात सुरू होतील. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळा बसमध्ये CCTV, GPS आणि महिला सेविका असणे आवश्यक करण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे ६ हजारांहून अधिक शाळा बसेस आणि त्यावरील कर्मचारी या नव्या नियमांच्या कक्षेत येणार आहेत.
या निर्णयानुसार, बस चालक, क्लीनर आणि महिला सेविकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. पूर्वी गुन्हेगारी प्रकरणात सहभाग, वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी शाळा व्यवस्थापनावर सोपवण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास शाळांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दर आठवड्याला सकाळी आणि संध्याकाळी मद्यपान व अंमली पदार्थ तपासणीसह, वाहनांची नियमित देखभाल होत आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे. राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांना यासंदर्भात सक्त सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
शालेय बस सेवा वापरताना पालकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बस वेळेवर येते का, चालक ओळखीचा आहे का, बसमध्ये GPS यंत्रणा कार्यरत आहे का, याची खात्री पालकांनी स्वतः करून घ्यावी. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.
शालेय अपघात, गैरवर्तन आणि अपहरणाच्या घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने हे व्यापक धोरण लागू केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.