पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड येथे संत पूजन व वारी साहित्य वाटप सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि गिरीश खत्री (अध्यक्ष, शिवस्व प्रतिष्ठान) यांच्या संयोजनात राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमात कोथरूड परिसरातील विविध दिंड्या आणि भजनी मंडळांना वारीच्या प्रवासात उपयुक्त ठरणारे टेंट, स्लीपिंग बॅग, टाळ, ताडपत्री, सतरंज्या आणि प्रवासी बॅग यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीचा उजाळा पाहायला मिळाला.
या वेळी मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “आशा पूजाविधी आणि साहित्य वाटपातून खऱ्या अर्थाने आध्यात्मिक समाधान मिळते. ‘देण्यातच आनंद असतो’ ही संतांची शिकवण आज प्रत्यक्ष अनुभवता आली. संतांचे पूजन हा पूर्वसंचित पुण्याचा भाग आहे.”
दादांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, “२१ जून रोजी जागतिक योगदिनाच्या निमित्ताने, पुण्यात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसोबत सामूहिक योगासत्राचे आयोजन करण्यात येणार असून, या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.”
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ह.भ.प. माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे भावस्पर्शी कीर्तन. त्यांनी आपल्या प्रभावी वाणीने वारकरी संप्रदायातील भक्ती, समर्पण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे विवेचन केले. “वारी म्हणजे चालणं नव्हे, ती अंतःकरणातील भक्तीची जागृती आहे,” असे ते म्हणाले.
संयोजक गिरीश खत्री म्हणाले, “या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. संतांचे पाद्यपूजन आणि वारकऱ्यांना साहित्य वाटप हे आमचे वार्षिक कार्य बनले आहे. मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सततच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडतो.”
कार्यक्रमास ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, तसेच पंढरपूर, देहू आणि आळंदी येथील देवस्थानांचे प्रतिनिधी, कोथरूडमधील अनेक भजनी मंडळे आणि दिंड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि भक्तिरसाने भरलेला वातावरण अनुभवायला मिळाले.
