31.1 C
New Delhi
Wednesday, March 12, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानवाहन-मुक्त उपक्रमामुळे नवीन ग्राहकांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; दुकानदारांची माहिती

वाहन-मुक्त उपक्रमामुळे नवीन ग्राहकांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; दुकानदारांची माहिती

पिंपरी,- : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी मार्केट येथे महानगरपालिकेच्या वतीने वाहन-मुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पिंपरी मार्केटमधील संपूर्ण रस्ते दोन दिवस सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यामधील ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या समारोप सत्रामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वाहतूक पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील, प्रतिनिधी डब्बू आसवानी, मराठी अभिनेते अभिज्ञा भावे, दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी नीरज चावला, पुरुषोत्तम बोधवानी तसेच शहरविकास तज्ज्ञ प्रसन्न देसाई, आशिक जैन यांच्यासह स्थानिक दुकानदार व नागरिकांशी चर्चा केली.

यामध्ये दुकानदार संघटनांनी महापालिकेच्या वतीने ३० आणि ३१ मार्च रोजी पुन्हा वाहन-मुक्त उपक्रम राबविण्यात यावा, बाजारपेठांचा मार्ग कायमस्वरुपी पादचारीमार्ग व्हावा, अशी विनंती आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. यावर आयुक्त शेखर सिंह यांनी लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.

चाय पे चर्चा कार्यक्रमात बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘वाहन-मुक्त दिन उपक्रमासारखे उपक्रम यशस्वी होण्यासाठी समाजातील नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा महत्वाचा असतो. दिल्ली येथील चांदणी चौकातील पादचाऱ्यांच्या परिवर्तनातून तुम्ही पाहिलेले चित्र येथे वास्तवात उतरू शकते. तथापि, चांगले बदल होण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी मजबूत समुदायाचा पाठिंबा आवश्यक असून विचारविनिमय करून यावर मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.

वाहन-मुक्त उपक्रमादरम्यान पिंपरी मार्केटमध्ये नवीन ग्राहकांमध्ये २० टक्के वाढ झाली असून वाहनमुक्त वीकेंडमुळे व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर ध्वनी, वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडी दूर झाल्यानंतर नागरिक सहजरित्या बाजाराकडे आकर्षित होतात. दुकानदार संघटनेने सुरुवातीला उपक्रमाबाबत शंका व्यक्त केली. परंतू वाहन मुक्त उपक्रमाच्या यशानंतर या उपक्रमामध्ये क्षमता असल्याचे जाणवत आहे. आमची कुटुंबे पिढ्यानपिढ्या या व्यवसायात आहेत, परंतु वाढती वाहतूक कोंडी पुढील पिढीला पुढे जाण्यापासून परावृत्त करत आहे. वाहन-मुक्त दिन यांसारखे उपक्रम पादचाऱ्यांसाठी अनुकूल बाजारपेठ खरेदीला अधिक आनंददायी अनुभव बनवू शकतात आणि यामुळे व्यवसाय देखील भरभराटीला येऊ शकते, असे नागरिक प्रतिनिधी डब्बू आसवानी यांनी सांगितले.

अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी रस्ता सुरक्षिततेचे फायदे अधोरेखित केले. ‘जागतिक शहरांमधील बाजारपेठा आकर्षक आहेत. त्या आपल्याला मुक्तपणे चालण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतात. पिंपरी चिंचवड या दिशेने पावले उचलत असेल, तर आपण त्याचे समर्थन केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

शहरविकास तज्ज्ञ आशिक जैन यांनी चाचणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझाईन्स सादर करुन सुरू असलेल्या प्रभावी मूल्यांकन अभ्यासाची रुपरेषा सादर केली. यामध्ये शहरी गतिशीलता आणि प्रकल्प विभागाच्या देखरेखीखाली येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि भागधारकांच्या अभिप्रायावरील माहिती तसेच महानगरपालिकेच्या पुढील महत्वाकांक्षी उपक्रमांची माहिती दिली.

आयटीडीपी इंडियाचे प्रांजल कुलकर्णी म्हणाले, ‘जेव्हा बाजारपेठा वाहनांना नव्हे तर लोकांना सेवा देतात, तेव्हा बाजारपेठा भरभराटीला येतात. या उपक्रमानंतर सुरुवातीच्या निरीक्षणांमध्ये हवा आणि ध्वनी प्रदूषणामध्ये लक्षणीय घट दिसून आली असून त्याच्या तपशीलवार परिणामांची माहिती लवकरच समोर येईल.

शहरविकास तज्ज्ञ प्रसन्ना देसाई म्हणाले, व्यावसायिक क्षेत्रातील पादचाऱ्यांसाठीचे क्षेत्र हे एकप्रकारे ओपन मॉल म्हणून काम करते. ही जागतिक स्तरावर यशस्वी संकल्पना असून ही संकल्पना खरेदीचा आनंददायी आणि अडथळाविरहीत अनुभव वाढविण्यास मदत करेल.
……
चौकट
वाहन-मुक्त उपक्रमाच्या यशामागे वाहतुक पोलिसांचे उत्तम नियोजन !
वाहन-मुक्त उपक्रम यशस्वी होण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व वाहतूक पोलिसांच्या पथकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, दुकानदारांना सहभागी करून घेण्यासाठी दोन आठवड्यांहून अधिक काळ तयारी सुरू होती. वाहनांसाठी पार्किंगसाठी चार मोफत जागा ठरविण्यात आल्या आणि सुरळीत वाहतूकीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले. पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
…..
चौकट
संवाद सत्रांना चांगला प्रतिसाद
संवादात्मक सत्रादरम्यान रहिवाशांनी शहराच्या इतर भागांमध्ये पार्किंग आणि वाहतूक कोंडीबद्दल चिंता व्यक्त करताना वाहन-मुक्त उपक्रमासारख्या उपक्रमांना त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्त शेखर सिंह आणि वाहतूक निरीक्षक पाटील यांनी या मुद्द्यांवर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांचे पाठबळ, व्यावसायिकांना फायदा आणि पर्यावरणीय लाभांसह, पिंपरी मार्केटने वाहनमुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. यामुळे बाजारपेठा अधिक सुलभ, चैतन्यशील आणि शाश्वत बनणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
29 %
5.1kmh
40 %
Wed
35 °
Thu
36 °
Fri
33 °
Sat
33 °
Sun
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!