30.6 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानव्यवसायात यशासाठी ‘मर किंवा मार’ हा निर्धार गरजेचा : डॉ धनंजय दातार

व्यवसायात यशासाठी ‘मर किंवा मार’ हा निर्धार गरजेचा : डॉ धनंजय दातार

पुणे :आज प्रत्येक क्षेत्राप्रमाणे व्यवसायातही तीव्र स्पर्धा आहे. व्यवसायात प्रवेश करणे सोपे असले तरी टिकून राहणे अवघड असते. व्यवसाय हा विरंगुळ्यासाठी किंवा दानधर्मासाठी करायची गोष्ट नसून त्यात नफा हे एकमेव ध्येय समोर ठेवावे लागते. त्यामुळे व्यवसायात यश मिळवायचे असेल तर नवउद्योजकांनी कामाची लाज न बाळगता मेहनत करावी आणि ‘मर किंवा मार’ (डाय ऑर किल) अशा निर्धारानेच पाय रोवून उभे राहावे, असा सल्ला दुबई स्थित ‘अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार dr dhanjay datar यांनी नवउद्योजकांना दिला.

‘आकार डिजी ९’ न्यूज चॅनलतर्फे आयोजित आणि ‘ट्रायझॉन कॉर्पोरेट सर्व्हिसेस’ तर्फे प्रस्तुत ‘दुबई बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५’ या कार्यक्रमात ते बोलत होते. दुबईतील इंडिया क्लबच्या उत्सव हॉलमध्ये हा कार्यक्रम नुकताच झाला. मराठी उद्योजकांना दुबईत व्यवसाय करण्याची संधी मिळावी व बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने आकार ‘डिजी ९’चे संस्थापक प्रभाकर सूर्यवंशी यांनी या बिझनेस टूरचे आयोजन केले होते. दुबईतील प्रथितयश मराठी उद्योजकांशी त्यांनी या कार्यक्रमात संवाद साधला.

धनंजय दातार म्हणाले, मी ४० वर्षांपूर्वी दुबईत आलो त्यावेळी जी स्पर्धा होती त्याहून अधिक प्रचंड स्पर्धा सध्या आहे. जगभरातून अनेक उद्योजक या करमुक्त बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी येथे गर्दी करत आहेत. अशावेळी आपले अस्तित्व राखायचे असेल तर दुसऱ्यावर मात करावीच लागते. व्यवसाय हा फक्त नफ्यासाठीच करायचा असतो. नफ्याचे मार्जिन कमी ठेऊनही आपण स्पर्धेत तग धरु शकतो. मात्र झटपट नफ्याच्या आशेने आलेल्यांना उतावीळपणाने काही मिळत नाही.”

दुबईसारख्या बाजारपेठेत व्यवसायात टिकून राहण्यासाठी संयम लागतोच, परंतु येथील कायद्यांचे काटेकोर पालनही करावे लागते, असे सांगून ते म्हणाले, की नवजात अर्भक जसे तीन वर्षांनी चालायला, बोलायला व स्वतःहून खायला लागते तसेच कोणताही नवा व्यवसाय किमान १००० दिवस चिकाटीने चालवला तरच तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. मराठी तरुणांनी बदलत्या काळात स्वतःची पारंपरिक बुजरी आणि संकोची वृत्ती सोडून देऊन धाडसाने आपला व्यवसाय जागतिक बाजारपेठांत पोचवला पाहिजे. गुणवत्तापूर्ण उत्पादने व अभिनव सेवा स्पर्धात्मक किंमतीत देऊ केल्यास ते हमखास यशस्वी होतील.”

‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’चे उपाध्यक्ष राहुल तुळपुळे म्हणाले, की कोणताही व्यवसाय सुरू करताना ग्राहकांना कशाची गरज आहे याचा विचार करुन संधी कशी साधता येईल, याचा विचार नवउद्योजकांनी करावा. गेल्या काही वर्षांत दुबईत बाहेरुन येणाऱ्या व्यावसायिकांची संख्या वाढली असल्याने प्रत्येक क्षेत्रात संधी आहे, हे आढळत आहे.

‘बीसीडब्ल्यू इन्शुरन्स कन्सल्टन्सी’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक कोल्हटकर यांनी जोखीम व्यवस्थापनाविषयी (रिस्क मॅनेजमेंट) मार्गदर्शन केले. दुसऱ्या देशात व्यवसाय करताना तेथील बाजारपेठेचा अभ्यास करुन व कल बघून मगच पाऊल टाकावे. मराठी तरुणांना दुबईत व्यवसाय संधींचे मार्गदर्शन करण्यासाठी व दिशा देण्यासाठी गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम कार्यरत आहे, असे त्यांनी नमूद केले.
संयुक्त अरब अमिरातीत (युएई) अनेक वर्षांपासून आरोग्यक्षेत्रात सेवा देणारे डॉ. संजय पैठणकर तसेच या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘क्विक हील’चे ओंकार शेणोलीकर आपले अनुभव सांगितले. श्री. शेणोलीकर यांनी तंत्रज्ञानसंबंधित व्यवसायांबद्दल माहिती दिली. इतिहासात अटकेपार झेंडा रोवणारा मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात मागे नसून अनेक मराठी उद्योजकांनी भारताबाहेर महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आगामी काळात अनेक मराठी उद्योजक नक्की घडतील, असा विश्वास प्रभाकर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. श्र्वेता घालवाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.6 ° C
30.6 °
30.6 °
28 %
3.2kmh
0 %
Fri
30 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!