पिंपरी,- जपानी तंत्रज्ञानाला जगभरात मागणी आहे. भारत आणि जपान यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सौहार्द पूर्ण संबंध आहेत. भारतीयांमध्ये भरपूर प्रतिभा आहे. अशा प्रतिभावान व्यक्तींसाठी जपान मध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. जपान मध्ये राहण्यासाठी उत्तम सुखसोयी, चांगल्या संधी, उत्तम वेतन मिळते; याचा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, असे मत एससीसीआयपीचे अध्यक्ष रेन्या किकूची यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) निगडी येथे जपान मधील रोजगार संधी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन किकूची यांच्या हस्ते करण्यात आले. पीसीसीओई मध्ये सलग चौथ्या वर्षी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी जलतापचे संस्थापक सदस्य डॉ. हरी दामले, डीजी फ्युचरटेक इं. प्रा. लि.चे सीईओ आनंद शिरळकर, सूत्र सिस्टीम्सचे मुख्य अभियंता रुपेश मेतकर, एनटीटी डेटा इं. वरिष्ठ मानव संसाधन प्रमुख संजय खोराटे, मोसाइक प्रा. लि. बंगलोर एमडी हिरो इशिदा, प्रोसिड टेक्नॉलॉजीचे समीर लघाटे, स्वाती भागवत, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संबंध विभाग अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते.
पीसीसीओई मध्ये मागील चार वर्षांपासून जपान मधील शैक्षणिक, रोजगार संधींवर कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित केली जात आहेत. पीसीसीओई मधील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीची ओळख हळूहळू होत आहे. विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रमांतर्गत मागील वर्षी पंधरा विद्यार्थ्यांनी जपानला भेट दिली. संस्थे मधून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांना जपान मध्ये रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
विज्ञान तंत्रज्ञानात जपानने मोठी झेप घेतली आहे. भविष्याच्या दृष्टीने तेथे अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचा फायदा घेतला पाहिजे. भारत – जपान मैत्रीपूर्ण संबंध जमेची बाजू आहे. त्यासाठी जपानी भाषा शिकली पाहिजे. आजची आंतरराष्ट्रीय परिस्थिती, अमेरिकेचे धोरण पाहता भारतीय विद्यार्थ्यांनी जपान मधील संधींचा सकारात्मक विचार केला पाहिजे, असे डॉ. हरी दामले म्हणाले.
दुपारच्या सत्रात रुपेश मेतकर, संजय खोराटे, हिरो इशिदा, समीर लघाटे, स्वाती भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शंकांचे निरसन केले.
प्रास्ताविक डॉ. रोशनी राऊत आणि आभार डॉ. संदीप पाटील यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.