पुणे — सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ व २६ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिले दोन दिवसीय बीज संमेलन होणार आहे. हे संमेलन भारती विद्यापीठाच्या पुणे- सातारा रोड येथील धनकवडी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होणार आहे.या संमेलनात बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये व सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सह्याद्री देवराईचे संस्थापक अध्यक्ष व अभिनेते सयाजी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, विचारभारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी उपस्थित होते.

एकतरी झाड लावूया चला सावली पेरूया ‘ हे या संमेलनाचे बोधवाक्य आहे. सह्याद्री देवराईचे दहा तज्ञ सदस्य भारती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना ताम्हिणी घाटात सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत बीज संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणार आहेत.
प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी भारती विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून भारती विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी आणि सह्याद्री देवराईचे पर्यावरणप्रेमी मिळून राज्यातून बिया गोळा करणार आहेत.
संमेलनाचे उद्दिष्ट
या बीज संमेलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार आणि सुधारित बियाण्यांची माहिती पोहोचवणे, बियाण्यांच्या शास्त्रीय उत्पादन व संवर्धन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि स्थानिक पातळीवर बीज स्वावलंबन वाढवण्यास मदत करणे आहे.
याशिवाय, बदलत्या हवामान परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असलेल्या नवीन बियाण्यांच्या जातींबद्दल जागरूकता वाढवणे, स्थानिक व पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व पटवून देणे हे देखील या संमेलनाचे उद्दिष्ट आहे.
विशेष आकर्षणे
- बीज प्रदर्शन मेळा: विविध कंपन्यांच्या सुधारित बियाण्यांचे स्टॉल्स.
- तांत्रिक मार्गदर्शन केंद्रे: शेतकऱ्यांना बीज साठवणूक, प्रक्रिया व गुणवत्ता सुधारणा याबाबत मार्गदर्शन.
- स्टार्टअप झोन: नव्या कृषी स्टार्टअप्सना आपले प्रकल्प सादर करण्याची संधी.
नोंदणी आणि सहभाग
- शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि इच्छुक उद्योजकांसाठी प्रवेश खुला आहे.
- ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध.
- अधिक माहितीसाठी भारती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
राज्यातील पहिलेच असे दोन दिवसीय ‘बीज संमेलन’ पुण्यात होत असल्याने शेतकरी, कृषी विद्यार्थी व संशोधक यांच्यात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. हे संमेलन केवळ चर्चांचा मंच नसून, शाश्वत शेतीकडे वाटचाल करणाऱ्या बीज क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.