पिंपरी, – “काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानचा भारताला उचकावण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास(Ramdas Athawale) आठवले यांनी केले.
वाकड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad news)शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि जैतवन बुद्ध विहारात गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आठवले यांच्या हस्ते झाली.
यानंतर झालेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते.
आठवले म्हणाले, “आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा निर्धार मोदी सरकारने केला आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. भारत शांततेच्या बाजूने आहे, परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हे वारंवार संकट निर्माण करतात. त्यामुळे आता आरपारची लढाई अपरिहार्य झाली आहे.

राजकीय मागण्या व आगामी योजना
पत्रकार परिषदेत आठवले यांनी सांगितले की, महाराष्ट्र मंत्रिमंडळात आरपीआयला मंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महामंडळे, जिल्हा नियोजन समित्या यामध्येही आरपीआयच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी चर्चा सुरू आहे.
ते म्हणाले, “झोपडपट्टी वाढ थांबवण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर द्यायला हवा. भूमिहीनांना पाच एकर जमीन मिळावी यासाठी सरकारने व्यापक सर्वेक्षण हाती घ्यावे.”
आरपीआयचा विस्तार आणि निवडणूक तयारी
“आरपीआय हा केवळ बौद्धांचा नव्हे तर सर्व जाती धर्मांचा पक्ष आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी एक जून रोजी ठाणे येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महायुतीसोबत आठ ते दहा जागा आरपीआयला मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“सफाई कर्मचाऱ्यांच्या ठेकेदारी पद्धतीला विरोध असून, त्यांना कायमस्वरूपी नोकरीची हमी मिळावी,” अशीही ठाम भूमिका आठवले यांनी मांडली.
कार्यक्रमास आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांताताई सोनकांबळे, माजी नगरसेवक मयूर कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.