इंदापूर -प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे वटपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिरातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीची गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या पालखी सोहळ्यास महादेव भजनी मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. गावातील स्वामीभक्त महिलांनी आपल्या घरासमोर तसेच चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.
पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर ह.भ.प. रमेश महाराज कट्टे (वालचंदनगर) यांचे श्री स्वामी समर्थ चरित्रावर आधारित प्रवचन झाले. त्यानंतर उपस्थित स्वामीभक्तांनी श्री स्वामी समर्थांचा नामजप व आरती करून भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेतली.
पालखीची आकर्षक सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली होती, तर मंदिरातील सुंदर रांगोळीची सेवा सौ. शितल सुनील टकले यांनी साकारली. कार्यक्रमानंतर श्री महेश सुभाष माने यांच्या वतीने सर्व स्वामीभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यास वालचंदनगर येथील स्वामीभक्त श्री राम कुंभार सर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच निमसाखर व परिसरातील मोठ्या संख्येने स्वामीभक्तांनी उपस्थित राहून वटपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.


