पुणे :– क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजावर झालेल्या दूरगामी परिणामाचा आढावा घेत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेसाठी दिलेला लढा अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांतूनच आज महिलांना शिक्षण, आत्मनिर्भरता आणि समानतेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सावित्रीबाईंच्या संघर्षाचा परिणाम म्हणूनच आज महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून ‘लाडक्या बहिणी’सारखे उपक्रम महिलांना सक्षम बनवत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सामान्य महिलांना दिलासा देणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळेच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळू शकले, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
आजही समाजात मुलींवरील अत्याचार, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचित राहण्याच्या समस्या कायम आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘सेफ कॅम्पस’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, पुणे माळी महासंघाच्या हेमाताई लडकत, बाळासाहेब लडकत, प्रज्वल बनकर, यशोधन आखाडे, महात्मा फुले मंडळाचे विश्वस्त योगेश वाघोले, पर्वती प्रभागातील शिवसेना उमेदवार महेंद्र जोशी, तुषार भामरे, भारती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


