केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्धार
पुणे: पुणे शहराचा सर्वांगीण विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान‘ हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.

गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे क्रीडांगणावर आयोजित १६ व्या ‘जनता दरबारात’ ते बोलत होते. खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात मोहोळ यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या प्रसंगी महापौर मंजूषा नागपुरे, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांसह पुणे महापालिका, पुणे पोलिस आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अशा प्रकारे जनता दरबार भरवून स्थानिक, राज्य आणि केंद्र स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहेत.
‘पुणे शहराचा खासदार या नात्याने मी आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार पुणेकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणेकरांनी दाखविलेला विश्वास महायुती सार्थ ठरवित आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण जनता दरबारच्या माध्यमातून केले जात आहे,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

‘शिवाजीनगर-हिंजवडी ही पीपीपी मॉडेलवरील देशातील पहिली मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेत येईल. या तेवीस किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आहे. पुण्यातील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचा वाघोलीपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचा कात्रजपर्यंत विस्तार होणार आहे. याशिवाय खडकवासला-खराडी आणि माणिकबाग ते नळस्टॉप या नवीन मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊन शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल.’ असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी ३२५ एकर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून त्याच्या भूसंपादनाला गती देण्यात आली आहे,’ असे मोहोळ यांनी सांगितले.
अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाचा तपास विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) करत आहे. नियमानुसार, एका महिन्यात (२८ फेब्रुवारी) त्यांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध होईल. त्यातून अपघाताची वस्तुस्थिती आणि सत्य समोर येईल, असेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.


