पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती-उपसभापती निवडी रखडल्या होत्या. मात्र आता या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, २० मार्चपूर्वी जिल्हा परिषदेची पहिली बैठक घेऊन अध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडी पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर तब्बल पंधरा दिवस उलटूनही नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक झालेली नव्हती. परिणामी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतींच्या निवडी प्रलंबित राहिल्या होत्या. अखेर ग्रामविकास विभागाने याबाबत स्पष्ट आदेश देत निवडणूक झालेल्या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ११ (१) आणि ५९ (१) नुसार नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ त्यांच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे ही पहिली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतच अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी लवकरच निवडीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, प्रथम तालुकास्तरावर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडी घेतल्या जातील. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांत होणार निवडी
जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सत्तास्थापनेसह अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडी होणार आहेत.
आता २० मार्चपूर्वी पहिली बैठक होणार असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील सत्ताकारणाला वेग येणार असून, स्थानिक राजकारणात हालचालींना चांगलाच जोर आला आहे.


