पुणे : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे सुरू असलेला मंदिर जीर्णोद्धार प्रकल्प देशपातळीवर लक्षवेधी ठरत आहे. पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ चार महिन्यांत दगडी सभामंडप उभारण्याचा हा प्रयोग देशात प्रथमच राबविला जात असून, या विक्रमी कामाची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.खेड तालुक्यातील भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या आराखड्यासाठी सुमारे २८८ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी केवळ सभामंडपाच्या उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पुरातत्त्व विभागामार्फत पारंपरिक साहित्य, जुन्या स्थापत्य पद्धती आणि कुशल कारागिरीच्या सहाय्याने हे काम केले जात आहे.या प्रकल्पाअंतर्गत सुमारे २ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रफळाचा सभामंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपात एकूण ४८ स्तंभ असतील. विशेष बाब म्हणजे प्रत्येक स्तंभ केवळ दोन ते तीन दगडांत पूर्ण करण्यात येणार असून, त्यावर उभारल्या जाणाऱ्या कमानीदेखील तीन दगडांतच साकारल्या जाणार आहेत. मध्यभागी भव्य घुमट उभारला जाणार असून, तोही याच पारंपरिक पद्धतीने दगडात कोरून उभा केला जाणार आहे.
सामान्यतः अशा प्रकारच्या दगडी बांधकामासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, हा संपूर्ण सभामंडप अवघ्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कमी वेळेत पारंपरिक स्थापत्यशैलीत पूर्ण होणारा हा प्रकल्प राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदर्श ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या अनोख्या उपक्रमाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, “भीमाशंकर मंदिराच्या या कामाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होणे हे केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरेल. यासाठी लवकरच तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पदाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.”
कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू असलेला हा जीर्णोद्धार प्रकल्प श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक नियोजन यांचा संगम ठरत असून, भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या विकासात एक नवा अध्याय जोडणारा ठरणार आहे.


