नवी दिल्ली : आजपर्यंत नागरिकांकडून ओळख आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरले जाणारे आधार कार्ड यापुढे जन्मतारखेच्या खात्रीशीर पुराव्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. Unique Identification Authority of India (यूआयडीएआय) यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देत आधार कार्डाची मर्यादा स्पष्ट केली आहे.
यूआयडीएआयच्या निवेदनानुसार, आधार कार्ड हे केवळ व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरता येईल. मात्र, त्यावरील जन्मतारीख ही अधिकृत किंवा अंतिम पुरावा मानली जाणार नाही. त्यामुळे शासकीय किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी जन्मतारखेचा पुरावा सादर करताना नागरिकांनी इतर वैध कागदपत्रांचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
यामागील प्रमुख कारण म्हणजे आधार नोंदणीच्या वेळी अनेकदा जन्मतारीख अंदाजे दिली जाते किंवा त्यासाठी ठोस कागदपत्र सादर केलेले नसते. त्यामुळे आधारवरील जन्मतारीख नेहमीच अचूक असेल, याची खात्री देता येत नाही. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे.
यूआयडीएआयच्या मते, देशातील अनेक न्यायालये आणि शासकीय विभागांनीही आधार कार्डाला जन्मतारखेचा अंतिम पुरावा मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अधिकृत कामकाजात इतर विश्वसनीय कागदपत्रांना प्राधान्य दिले जात आहे.
जन्मतारखेचा खात्रीशीर पुरावा म्हणून नागरिकांनी जन्म प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, पासपोर्ट किंवा संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. ही कागदपत्रे अधिकृत आणि विश्वासार्ह मानली जातात.
दरम्यान, यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की हा कोणताही नवीन नियम नसून, विद्यमान नियमांचे स्पष्टीकरण आहे. आधार कार्डाचे महत्त्व कमी झालेले नसून, ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी ते तितकेच आवश्यक राहणार आहे.
आजच्या घडीला बँक व्यवहार, शासकीय योजना, विविध परवाने आणि अन्य सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य घटक बनले आहे. मात्र, जन्मतारखेच्या बाबतीत नागरिकांनी योग्य आणि अधिकृत कागदपत्रांचा वापर करणे गरजेचे असल्याचे यूआयडीएआयने अधोरेखित केले आहे.


